बुद्धी असली म्हणजे अतिरेकीपणाला आळा बसतो. बुद्धी सकारात्मक बनण्याच्या मार्गात गरीबी हा मोठा अडथळा होऊ शकतो.
जगातील बहुतेक संपन्न देश हे थंड हवामानाचे आहेत. याउलट, बहुतेक गरीब देश उष्ण कटिबंधात आहेत. उष्ण प्रदेशात माणसाच्या गरजा तशा थोड्या असतात. शरीराला उष्मांक फारसे पुरवावे लागत नाहीत. कपडालता, अंथरूणपांघरून जुजबी असते तरी चालते. आकाशाखाली झोपावे, भाकरीवर संतुष्ट व्हावे हे उष्ण प्रदेशात शक्य असते, एवढेच नव्हे तर सुखकारकही असते. थंड प्रदेशात असे जगताच येत नाही. थंडीच्या कडाक्यात पुरेसे उष्मांक मिळाले नाही. जीव वाचविण्यासाठी का होईना, राहणीमान सुधारण्याची आणि जीवनाविषयी सकारात्मक, व्यवहारी हिशोबी भूमिका घेणे भाग पडते.
आणि शेवटी, सर्वांत महत्त्वाचा मुद्दा. संपन्न समाज आणि लोक वर्तमान काळात जगतात, भविष्याकडे डोळे लावून जगतात. दरिद्री समाज आणि माणसे भूतकाळाकडे मागे पहात दिवस काढतात आणि जुन्या काळात कधी तरी संपन्न असलेल्या आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे, थोरवीचे आणि वैभवाचे वर्णन आठवतात; अशा थोर पूर्वजांचे आपण वंशज, तेव्हा 'पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना, भावी रम्य काल' अशा श्रद्धेने इतिहास 'चक्रनेमिक्रमाने' आपल्यावर फिरून एकदा बहाल होण्याची वाट पाहत राहातात.
कर्णाला पौरुषाचा अभिमान होता. म्हणून सारथी कुळात जन्मल्याच्या आरोपाचा त्याला फारसा विषाद वाटत नव्हता; पण वर्तमानळात ज्यांची बुद्धी, शक्ती, धाडस कमी पडते त्यांनी जागवे कसे? आपण सर्वच तऱ्हांनी नादान ठरलो आहोत आशा नाही, वर्तमानातही काही स्थान नाही. अशांना भूतकाळाकडे नजर फिरविण्यापलीकडे काही विकल्पच रहात नाही. आम्ही असेही असू पण आमचे पूर्वज थोर, आमचे बीज श्रेष्ठ आहे, आम्ही थोर जातीचे, थोर धर्माचे, आमच्या मातृभाषेसारखी भाषा नाही, आमच्या साहिल्यासारखे साहित्य नाही, खरेखरं थोर संत झाले ते येथेच, आमच्या राजासारखे राजे कोठे झाले नाहीत. असे स्वप्न रंजन हा एकच आशेचा तंतू रहातो. या तंतूला प्राणपलीकडे जपावे लागते. हा धागाही तुटला तर मग सगळा अंधःकारच. पौरुषहीनांचे इतिहासप्रेम ही त्यांच्या ठेचल्या गेलेल्या अहंकाराची मलमपट्टी असते.
गावागावातील शेतकरी एकमेकांशी भांडणे तंडत तंडत विनाशाकडे घसरत जातात. एमेकांतील किरकोळ वाद लढत लढत समाज आणि राष्ट्रे घसरत अधःपाताकडे जातात. सकारात्मक बुद्धी नाही म्हणून समंजसपणा दाखविता