अधिक धार्मिक आणि परंपरानिष्ठ बनू लागले असे दिसते. का हा जातीयवादी पक्षांच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम आहे?
आमच्या देशाच्या भूतकाळातील समृद्धीच्या गुणगानात जर आम्हाला कमी अडकवले असते तर आज आम्ही जरा बऱ्या अवस्थेत असतो असा युक्तिवादही तितक्याच तिडीकीने करता येईल. खरं म्हणजे, ज्यांच्याजवळ जगासमोर ठेवण्यासारखं काहीच नाही त्यांनाच भूतकाळ उकरून काढून भूतकाळातील खाणाखुणांना समृद्धी चिटकवून बडेजाव मिरविण्याची गरज भासते. राष्ट्रीयतेची भावना लोप पावत आहे, परदेशांचे आकर्षण देशाभिमानावर मात करीत आहे हे खरे आहे. आपल्या देशाबद्दल अभिमान बाळगणे ही तोंडची वाफ दवडण्याइतकी सोपी गोष्ट नाही. आज देशातील बहुसंख्य लोकांना हा देश आपलाच आहे का असा प्रश्न पडतो. हे तेच लोक आहेत ज्यांच्या मतदानाचा हक्क काढून घेण्यात यावा असे नानी पालखीवालांना हवे आहे. आणि याच लोकांनी स्वतःला धन्य धन्य समजून नानींच्या देशाला अधिक समृद्ध बनविण्यासाठी डोळे झाकून आपली आहुती द्यावी अशीही त्यांची अपेक्षा आहे.
स्वातंत्र्याबरोबर जबाबदाऱ्याही येतात हे मान्य आहे. इंदिरा गांधींनी नानी पालखीवालांशी सहमत होऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे घटनेत दुरुस्ती केली, पण त्यामुळे काही सुधारणा झाल्याचे दिसत नाही. स्वातंत्र्याचा अतिरेक हे खरंच आपल्या देशाच्या अधोगतीचं कारण आहे का? माझ्या मते नियमांचा अतिरेक, परवाना पद्धतीचा अतिरेक, नियंत्रणांचा अतिरेक ही या सगळ्या अवनतीला कारणीभूत असलेली समस्या आहे. थोडक्यात, नानींनी हृदयात जपलेली मानसिक व नैतिक गुणवत्ता जनसामान्यांमध्ये तयार झालेली नाही हे देशाच्या अधःपतनाचे कारण नसून त्याचा परिणाम आहे. हे थोर घटनातज्ज्ञ घोड्यासमोर गाडी बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत! नानींसारखे बरेचजण, विशेषतः महानगरातले, नानींसारखाच विचार करतात ही मोठी केविलवाणी गोष्ट आहे. चुकांच्या उच्चभ्रू यादीमध्ये सातव्या क्रमांकावर कुणीतरी राज्यांच्या भाषावार फेररचनेचा उल्लेख केला आहे. नानींनी तो केला नाही, ही आनंदाची बाब आहे. का ती त्यांची नजरचूक होती?
तात्पर्य : शिक्षित आणि धनिकांपासून सावध रहा; अशिक्षित आणि गरीबांकडून काही धोका नाही.
(२१ ऑगस्ट १९९७)
♦♦