पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/142

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तपासलं. (भूगोलाप्रमाणे) की येणाऱ्याजाणाऱ्या दृष्टींनी अधिक सोयीचं केंद्र कोणतं? मला वाटतं अंबेजागाई हे आहे. अंबेजोगाईला एक मुख्यमंत्र्याचं घर ठेवावं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकेक दोन-दोन मंत्रालये ठेवली आणि त्या सगळ मंत्र्यांचा संबंध संगणाकांनी ठेवला तर मंत्र्यांची चित्र एकमेकांना दिसताहेत, एकमेकांना समोरा समोर बोलता येत आहे, कन्फरन्सिंग करता येतं, असं जर चित्र धरलं तर एक राजधानी असण्याची काही गरज पडणार नाही आणि आपली कामं करून घेण्याकरिता लांब जावंही लागणार नाही. येण्या-जाण्याची यातायात टाळण्याकरिता लहान राज्यं चांगली असं माझं मत आहे. लोकांच्या जवळ आलेली राज्यं चांगली; पण त्याकरिता फार तुकडे तुकडे पाडण्याची आजच्या तंत्रज्ञानात काही आवश्यकता आहे असं नाही.
 परवा मी बघितलं की, पंतप्रधानाच्या खोलीमध्ये संयुक्त राष्ट्र संधामध्ये जेव्हा निवडणूक चालू होती तेव्हा आणि जपानने आपला पार पराभव केला तेव्हा जपानला १४२ मते मिळाली अन् आपल्याला केवळ ४० मते मिळाली. त्यावेळी संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत जे काही मतदान चाललं होतं त्याचं चित्रण पंतप्रधानांच्या खोलीत (केबिनमध्ये) दिसत होतं. हे जर असेल तर आपल्या राज्याच्या जुन्या कल्पनेप्रमाणे लहान मोठा असा काही भाग असू नये; पण एकूण लहान राज्ये ही चांगली, जितकं विकेंद्रीकरण असेल तितके चांगलं हा प्रशानाचा नियम आहे. याच्यामध्ये जे मराठवाड्याच्या बाजूने आहेत त्यांनी लहान राज्य म्हणावे, असा वाद घालण्याचे कारण नाही. प्रशासनाचे घटक हे जितके सुटसुटीत असतील तितकं ते चांगलं.

 त्याच्या नंतरचा महत्त्वाचा मुद्दा. १९६० साली जेव्हा राज्याच्या सरहद्दी रिपोर्ट आला त्यानंतर इतक्या वर्षांनी आज पुन्हा आपण सगळं प्रकरण उघडायचा प्रयत्न करतो आहोत. या दोन परिस्थितीमध्ये मराठवाड्याच्या बाबतीत विचार करायचा झाला तर दोन महत्त्वाचे फरक आहेत. १९६० साली मराठवाड्याच्या लोकांची सर्वसाधारण बुद्धी अशी होती की, एखादं वासरू गाईपासून दूर गेलेले असावं आणि त्याला सोडल्याबरोबर धावत जाऊन आईच्या आचळाला आपण कधी लागतो असं वाटावं. अशी परिस्थिती तेव्हा मराठवाड्याच्या समाजाची होती. त्यांना वाटायचं, निजामाच्या कचाट्यातून आपण सुटलो; पण सांगता येत नाही काय होतंय? पंडित नेहरूंची इच्छा अशी दिसतेय की पोर्तुगीजांचा गोवा हा संस्कृतीचा ठेवा म्हणून तसाच ठेवावा आणि तसेच निजामाच्या राज्याच्या सरहद्दी न तोडता तो जसाच्या तसा ऐतिहासिक ठेवा म्हणून जपून ठेवावा.

भारतासाठी । १४२