पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणाले असते का की, आता देशातील सर्व लोकांना पुरेसे कपडे वापरायला मिळू लागले आहेत, आता मला इतके कमी कपडे वापरण्याची जरूरी नाही?
 दुसरा प्रश्न. आज गांधीजी असते तर सेवाग्राममध्येच असते का साबरमतीला परत गेले असते? ते म्हणाले असते का की साबरमती आश्रमातून दांडी यात्रेला निघताना मी प्रतिज्ञा केली होती की देशाला संपूर्ण स्वराज्य मिळेपर्यंत मी या आश्रमात परत येणार नाही; आता देशाला पूर्ण स्वराज्य मिळाले आहे तेव्हा मला साबरमतीला परतायला हरकत नाही?
 तिसरा प्रश्न. ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आत्मबलिदान केले, हौतात्म्य पत्करले त्यांच्या आत्म्याला देशाची आजची परिस्थिती पाहून सुख लाभत असेल का?
 महाराष्ट्र आणि गुजरातमधील प्रचारसभांत हे तीन प्रश्न विचारून लोकांकडून त्यांची उत्तरे मागत आलो.
 भले, मनमोहनसिंग म्हणोत की आम्ही प्रगती केली आहे किंवा पी. व्ही. नरसिंह राव म्हणोत की आम्ही देशाचा विकास केला आहे; पण मला कोणत्याही सभेत लोकांच्या चेहऱ्यावर या प्रश्नांची होकारार्थी उत्तरे दिसली नाहीत.
 अजून एक प्रश्न मी विशेषतः गुजरातमध्ये विचारला.
 आज निवडणुकीमध्ये आपल्यासमोर तीन प्रमुख पक्ष आहेत. एक पक्ष आहे, भाजप जो विश्व हिंदू परिषदेशी संबंधित आहे, राष्ट्रीय सेवक संघाशी संबंधित आहे. गांधीजींच्या देहाच्या हत्येची जबाबदारी ज्यांच्यावर टाकली जाते अशा लोकांशी हा पक्ष संबंधित आहे. त्यांच्यातील काही वक्ते आजसुद्धा गांधीजीना शिव्या देतात.

 दुसरा पक्ष आहे काँग्रेस. मी गेली १५ वर्षे सातत्याने मांडत आलो आहे की, गांधीजींच्या हत्येनंतर नेहरूंनी देशाचा कारभार एखाद्या सिनेमातील श्रीमंताच्या दिवाणजीने मालकाच्या मृत्यूनंतर केलेल्या कारभाराप्रमाणेच केला. मरणाच्या घटका मोजणाऱ्या श्रीमंताने दिवाणजीच्या हाती विश्वासाने तिजोरीच्या किल्ल्या सोपवून म्हणावे की माझी मुलं लहान आहेत, अजाण आहेत, त्यांची काळजी घे; पण दिवाणजीने मात्र सर्व मालमत्तेवर डल्ला मारून मालकाच्या मुलांना देशोधडीला लावावे. गांधीजींच्या आर्थिक विचारसरणीची हत्या पंडित नेहरूंनी केली. त्या नेहरूंचा काँग्रेस पक्ष सत्तेचाळीस वर्षे या देशावर राज्य करीत आहे. 'समाजवाद' शब्दाची भूल पडल्यामुळे कदाचित, सर्वसामान्यांच्या ही गोष्ट लक्षात आली नसेल; पण जेव्हा नेहरू-गांधीजींचा विचार फेकून देऊन देशाला

भारतासाठी । ११५