पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 साहेबांनी हजारो कोटी रुपये जमा केले आहेत, माफिया गुंडांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत, भूखंड इत्यादी प्रकरणांत त्यांनी भरपूर कमाई केली आहे, अशा बहुतांशी निराधार वावड्यांनी साहेबांवर मोठा अन्याय केला. कोर्टात गुन्हेगार म्हणून उभे राहावं लागलं तर काही साक्षीपुरावा होतो; स्वतःचा पक्ष मांडण्याची, बचाव करण्याची संधी आरोपीला मिळते. साहेबांना अशी संधीही मिळाली नाही. त्यांच्यावर जनापवादाने खटला चालला आणि ते संशयित असल्याचा सगळीकडे समज झाला. देशभरात त्यांची प्रतिमा कर्तबगार पण बेभरवशाचा आणि भालगड्या अशी झाली आहे. मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता त्यामुळे दुरावली आहे.
 दैनिक 'लोकसत्ता'चे माजी संपादक माधव गडकरी यांनी या विषयावर एक लेख १५ मे च्या 'लोकसत्ता'त लिहिला. त्याला उत्तर देताना साहेबांनीही या विषयावर मोठी खंत व्यक्त केली.अफवांच्या या वावटळीनं महाराष्ट्राचा विकास करण्याचं त्याचं स्वप्न मागे पडत आहे याबद्दल दुःख व्यक्त केलं.
 हे सगळं संपवण्याची संधी साहेबांपुढे चालून आली आहे आणि ती त्यांनी लगेच पकडली. साहेबांचं अभिनंदन याकरता केलं पाहिजे. मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त गो. रा.खैरनार 'जनतेचे हिरो' झाले आहेत. मुंबईतील बॉम्बस्फोटासंबंधी श्रीकृष्ण आयोगासमोर बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर काही आरोप केले. त्यानंतर अण्णासाहेब हजारे यांच्यातर्फे पुण्यात ३० मे रोजी भरवलेल्या भ्रष्टाचार-विरोधी बैठकीत साहेबांवर कमालीच्या निर्भीडपणे जाहीररित्या आरोप केले आहेत. साहेबांनी किमान १००० कोटी रुपयांची माया जमवली आहे. त्यांचे आणि त्यांच्या मित्रांचे गुंड टोळ्यांशी संबंध आहेत. साहेबांचे गतजीवन वाल्याकोळ्याप्रमाणे असल्यानं त्यांनी आता वाल्मिकी बनावं, असा सल्लाही त्यांनी साहेबांना दिला. भ्रष्टाचाराचा लढा कारकून, सब-इन्स्पेक्टर यांच्याविरुद्ध न लढवता शिखरस्थानाविरुद्धच लढवला गेला पाहिजे, असंही सुचवलं.
 या आव्हानाला मुख्यमंत्र्यांनी मोठ्या तडफेने आणि तिरीमिरीनं उत्तर दिलं.खैरनार साहेबांबर फौजदारी आणि दिवाणी खटले लावण्याचा आपला मनोदय जाहीर केला. खैरनारांनीही हे आव्हान स्वीकारलं आणि आपल्याजवळ असलेली सर्व माहिती आपण न्यायालयात सादर करू, प्रत्यक्ष नसला तरी परिस्थितीजन्य पुरावा सज्जड आहे, असं जाहीर केलं.

 महाराष्ट्राच्या अलीकडील राजकीय इतिहासात घडलेली ही मोठी शुभ घटना आहे. या एकाच खटल्यामुळे पवारसाहेबांना आपल्या चारित्र्याची शुद्धता

भारतासाठी । १०३