पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अंगावर चिकटलेला चिखल फेकलेल्या चिखलापेक्षा जास्त आहे.
 राजीव गांधींच्या पंतप्रधानकीच्या उत्तर काळात शरद पवारांच्या स्वामीनिष्ठेविषयी शंकेचं वादळ उठलं होते. दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रातही साहेबांनी जमा केलेल्या रकमेचा हिशेब आणि वाटा यावरून हे वादळ उठलं होतं असं उघडउघड म्हटलं जाई. अरबी भाषेतील सुरस कथांत संपत्तीची अफाट वर्णनं असतात. तसंच साहेबांच्या संपत्तीविषयी लोकांत वारेमाप अफलातून आकडे सांगितले जातात. १५००-१६०० कोटी इथपर्यंत आकडे बोलले जातात.
 साहेबांचा भूखंड प्रकरणाबद्दलही मोठा गवगवा आहे. त्यांची शहानिशा जनता दल शासनाच्या काळात होण्याची वेळ आली होती; पण त्या शासनात साहेबांचे दोस्त इतके, की चौकशीचा प्रस्तावच फेटाळला गेला.
 सापांच्या आणि भुतांच्या कथा सांगितल्या जाऊ लागल्या की, एकेक श्रोता आपल्या किंचित अनुभवांचेसुद्धा रसभरीत वर्णन करतो. तसंच चारचौघांत, चावडीत हा विषय निघाला की होतं. कोणी आपल्या चुलतभावाच्या मामाच्या मित्राच्या मालकांचा संदर्भ देऊन बदलीकरता पैसे कसे द्यावे लागले याची ऐकीव किंवा कपोलकल्पित कथा आग्रहानं सांगतो. कोणी इस्त्रायलच्या शस्त्रांच्या खरेदीबद्दल कमिशन मागितल्याची खास आतल्या गोटातील माहिती मोठ्या गंभीर स्वरात सांगतो. सुरेश कलमाडी, माधव आपटे अशी भारदस्त नावंही मध्ये फेकली जातात. त्यामुळे गप्पाटप्पांना वजन येतं.

 मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर साहेब दिल्लीहून मुंबईला परत आले तेव्हापासून कंड्या पिकवण्याला ऊत आला आहे. ठाकूर, कलानी यांना साहेबांनीच आमदारकी दिली, जे. जे. इस्पितळातील प्रकरणातले मारेकरी खुद्द साहेबांच्याच विमानातून लखनौहून मुंबईला आले; पप्पू कलानीच्या विश्वस्त निधीकडून चांगली सज्जड रक्कम साहेबांच्या एका संस्थेने घेतली. ती कर्जाऊ घेतल्याचं नंतर सांगण्यात आलं. या असल्या घटनांमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण संशय, अफवा यांनी बरबटून गेले आहे. साहेब दिल्लीहून मुंबईला आले तेच मुळी मुंबईतील बॉम्बस्फोटांची चौकशी त्यांचे आणि त्यांच्या दोस्तांचे दाऊद इब्राहिम टोळीशी असलेले लागेबांधे जगजाहीर न होता व्हावी या उद्देशानं, येथपर्यंत अफवा पिकवणाऱ्यांची मजल गेली. साहेब इस्त्रायल भेटीत खुद्द दाऊद इब्राहिमशी गाठभेट घेऊन आले अशी बातमी एका पाकिस्तानी सूत्राकडून प्रसिद्ध झाली तेव्हा तर महाराष्ट्राच्या राजकारणाचे खरे सूत्रधार दाऊद आणि अरुण गवळी हेच आहेत, असं बोललं जाऊ लागलं.

भारतासाठी । १०२